मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले. जल, जमीन, जंगल, जनावरांवर मालकी प्रस्थापित केलीय. या क्रांतीच्या नादात प्रदूषण आणि वृक्षतोडीमुळे शाश्वत विकासाचे तीन तेरा वाजवले. परंतु , बदलत्या मानवी जीवनशैलीस कोरोनाच्या कहराने चपराक दिलीय. माणूस निसर्गाच्या विरोधात गेला तर विध्वंस अटळ आहे. हे निसर्गाने दाखवून दिलंय. तरीही, माणूस अजूनही पर्यावरण रक्षण आणि संवर्धना करिता सजग दिसत नाहीय. अशा वेळी ‘ सीड्सबाँल ‘ ही लोकचळवळ म्हणून उभी राहणं, हे पर्यावरण रक्षणाच्या दिशेने क्रांतिकारक पाऊल ठरेल
यु एन ई पी च्या अहवालानुसार २० व्या शतकाच्या प्रारंभी पृथ्वीवर ७.० अरब हेक्टर वनक्षेत्र होते. मानवाकडून झालेल्या वृक्षतोडीमुळे ते घटून २.३५ अरब हेक्टरपेक्षा कमी राहिलंय. सिंमेंटच्या जंगलां साठी दररोज १४ हेक्टर जंगलांची म्हणजे , २ कोटी ९८ हजार झाडांची कत्तल केली जातेय. परिणामी, केवळ पशुपक्षी नामशेष न होता, मानवी आयुर्मानही वेगानं घटतंय. अशा स्थितीत पर्यावरण संवर्धनासाठी सीड्सबाँल किंवा बिजगोळे ही संकल्पना क्रांतिकारक पाऊल ठरतेय. ती एक लोकचळवळ म्हणून वेग घेतेय.
साध्या लाल किंवा काळी चिकट मातीतून बनतात हे सिड्सबाँल. या मातीत राख, शेण, कोळसा, कंपोस्ट खते ,कपड्यांचे तंतू , कोलोनाईट, स्मेकाटाईड, बेंटोनाईट सारखी रासायनिक खतं, मिसळून त्याचे गोळे बनवले जातात आणि या प्रत्येक गोळ्यामध्ये आवळा, जांभूळ ,पेरू , फणस, पपई, निंब , पिंपळ, वड, सीताफळ यासारखी ७० पेक्षा अधिक झाड किंवा फुलझाडांच्या बिया टाकल्या जातात.
प्रवासास, पिकनिक, फिरण्यास गेल्यावर तेव्हा जंगलात, ओसाड माळरानावर, नदी – तलावाकाठी , रस्त्याच्या दुतर्फा काही अंतरावर हे गोळे फेकले जातात; तर कधी जंगलात न जाता दूरपर्यंत गल्लोरीनेही पसरवले जाऊ शकतात. सहसा मे ,जून महिन्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला ही मुक्त पेरणी होते. या पावसाळ्याच्या चार महिन्यात कोणत्याही निगराणीशिवाय अंकूरलेली या सिड्सबाँलमधली बिजं ही वृक्षात रुपांतर होऊन पर्यावरण बहरण्यास मदत होते.
मिस्रमधुन उदयास आलेली ही संकल्पना
जपानच्या नौदानियामधील मासानोबु फुकूआका यांनी २००२ मध्ये पुन्हा जगासमोर आणली. पुढे २००७ च्या प्लास्टिक बंदीनंतर केनियाच्या टेडी किन्यानजुई याने या संकल्पनेस अधिक व्यापक वेग दिलाय. केनियाच्या अर्थ व्यवस्थेने हा उपक्रम प्राधान्याने घेऊन हेलिकॉप्टरने दरवर्षी अशा सिड्सबाँलची पेरणी केली आहे.
ठाणे जिल्ह्यात ही चळवळ जोमाने फोफावतोय उदयसिंग जिवनसिंग लोधी. ‘ ट्रांसफाँर्मेशन लाईफ ‘ या वृक्षप्रेमी संघटनेतून. शहापूर ,पालघर ,मुरबाड ,शेलु वांगणी , नवी मुंबई सारख्या जंगलांमध्ये उदयसिंग व त्याची टिम उत्साहाने हे सीड्सबाँल पसरविण्याची मोहीम सांभाळतायेत. वर्षभर वृक्षमित्र सचिन सुशील, डॉ. प्रणाली सिंग, हर्षणी, पर्यावरण प्रेमी सरिता खानचंदानी या सारख्या सामाजिक कार्य कर्त्यांच्या मदतीने विविध शाळा-महाविद्यालयांतून व्याख्याने, प्रात्यक्षिक , कार्यशाळांमधून ही संकल्पना पोटतिडकीने मांडतायेत.
२०१७ पासुन शेकडो विद्यार्थी व वनप्रेमींंच्या सहाय्याने लाखो सीड्स बाँल ठाणे जिल्ह्यातील जंगलांमध्ये पेरली आहेत.
लवकरच ही चळवळ अधिक वेगवान आणि समाजाभिमुख करून ‘ वर्ल्ड ग्रिनिज बुक ऑफ रेकॉर्ड ‘ मध्ये त्याची नोंद होण्याच्या मार्गावर आहे. येणाऱ्या पिढीसाठी जर पर्यावरण टिकवायचं असेल तर आपल्यालाही या लोकचळवळीत सामिल व्हायलाच हवं.
सिड्सबाँल च्या सहाय्याने पर्यावरण रक्षणार्थ एक क्रांतिकारक पाऊल टाकूयात आणि आत्मविश्वासाने म्हणू या ” वृक्षवल्ली आम्हा सोयरे , वनचरे !!! ‘
News by Praful Kedare
लेखक पत्रकार, कवी, सामाजिक कार्यकर्ते आहेत.