मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
अब्दुल रहीम आणि फातिमा खातुन यांचा विवाह २०१४ साली म्हणजे पाचच वर्षांपूर्वी झाला होता. विवाहानंतर चार महिन्यांनंतर अब्दुल सौदी अरेबियाला नोकरीसाठी गेला. नुकताच त्याने पत्नीशी मोबाईलवरून तीनदा तलाक शब्द उच्चारून काडीमोड केला आणि त्यांच्याविरोधात मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झाला.
पीडित महिलेच्या वडिलांच्या, अहमद अली यांच्या तक्रारीवरून उत्तरप्रदेशातील नेबुआ नौरंगिया पोलिस ठाण्यात संबंधित कायद्यातील कलम ४ नुसार गुन्हा दाखल झालाय. अब्दुल रहीम अधूनमधून घरी यायचा, पण त्याची फातिमासोबतची वर्तणूक चांगली नव्हती. फातिमाची सासरची मंडळीही तिची सतावणूक करीत, असं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
बुधवारी अब्दुल रहीम याने आपल्या वडिलांच्या ताराबुद्दीन यांच्या मोबाईलवर संपर्क केला. फातिमा तेव्हा घरकामात व्यस्त होती. सासऱ्यांनी दिलेला मोबाईल फातिमाने कानाला लावला आणि पलिकडून आवाज आला, तलाक तलाक तलाक आणि संपर्क तुटला. ही गोष्ट कळल्यावर फातिमाचे वडिल तिच्या सासरी हरयाणात कुशीनगरला गेले, तेव्हा ताराबुद्दीनने पंचायत बोलावली, दीड लाखांचा धनादेश दिला आणि विवाह संपुष्टात आल्याचं घोषित केलं, अशी या घटनेतील तक्रार आहे.
फातिमाचा पती सौदी अरेबियाला असल्याने त्याला यथायोग्य माध्यमातून रीतसर नोटीस बजावून दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवल्यावर कायदेशीर प्रक्रिया पार पाडून पुढील कारवाई करण्यात येईल, असं कुशीनगरचे पोलिस अधीक्षक आर एन मिश्रा यांनी म्हटलंय.
नव्या कायद्यानुसार, चुकीच्या पध्दतीने तिहेरी तलाक देणं गुन्हा असून, त्यात तीन वर्ष कारावासाची शिक्षा आहे. संसदेत हा कायदा मंजूर होऊन चार दिवसच उलटलेत आणि हा गुन्हा दाखल झालाय.