मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
शिलॉंग टाइम्सच्या संपादक आणि पद्मश्री पुरस्कार मानकरी पत्रकार पॅट्रिशिया मुखिम यांनी एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया या संघटनेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. संघटना फक्त बड्या पत्रकारांसाठी आवाज उठवते, असा गंभीर आरोप पॅट्रिशिया यांनी केला आहे.
पॅट्रिशिया यांच्यावर जुलै महिन्यातील एका फेसबुक पोस्टसंदर्भात गुन्हा दाखल आहे. त्याविरोधात त्यांनी मेघालय उच्च न्यायालयात दाद मागितली ; परंतु न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास असमर्थता दर्शवली. पॅट्रिशिया यांनी हा प्रकार एडिटर्स गिल्डमध्ये मांडला होता, परंतु त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. मात्र अर्नब गोस्वामीच्या फौजदारी गुन्ह्यांच्या प्रकरणात एडिटर्स गिल्डने ज्या घाईगडबडीत विधान जारी केलं, त्याने त्यांना धक्का बसलाय. अर्नबचं प्रकरण पत्रकारितेशी संबंधित नव्हतं, असं त्यांनी म्हटलं आहे.
उत्तरप्रदेशसहित देशभरातील पत्रकारांच्या हत्या, हल्ले, अटकसत्र, धमक्या, दबावाने नोकऱ्या गमावण्यासारख्या कित्येक विषयांत एडिटर्स गिल्ड ब्रसुद्धा काढत नाही. या पार्श्वभूमीवर पॅट्रिशिया यांनी कडक भाषेत लिहिलेल्या राजीनामा पत्रामुळे एडिटर्स गिल्डची बोटचेपी व पक्षपाती भूमिका चव्हाट्यावर आली आहे.