मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
कोरोनामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या पुरता अवकळलाय. एकीकडे जगण्याची धडपड तर, दुसरीकडे रोजच्या घरखर्चाच्या कसरतीने हैराण झालाय. त्यात या भीषण टाळेबंदीत महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना अवास्तव विजबिलं पाठवून त्यांची अधिकच क्रूर चेष्टा चालवलीय.
कंपनीने एप्रिल ते जून महिन्यातील बिलात सवलती देण्याऐवजी १५ ते २० टक्के वाढीव विजबिलं शेतकऱ्यांच्या माथी मारली आहेत. कंपनीने आकारलेली अंदाजे तीनही महिन्यांंची अव्वाच्या सव्वा बिलं पाहून शेतकऱ्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली असून प्रक्षुब्धतेचा भडका उडत आहे.
याचा परिणाम म्हणून प्रहार शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष कृष्णा जाधव आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांच्या नेतृत्वाखाली संतप्त शेतकऱ्यांनी ही वाढीव विजबिलं तहसीलदार कार्यालयासमोरच पेटवून जाहीर होळी केली.
यावेळी शेतकरी नेते कृष्णा जाधव यांच्यासोबतच, ग्रामीण जिल्हाअध्यक्ष राजू शिरसाठ , तालुका अध्यक्ष मधुकर पाचपिंडे , युवा अध्यक्ष महेंद्र बोरसे आदींंनी, शासनाने त्रस्त शेतकऱ्यांना महावितरण कंपनीने आकारलेले ही वाढीव बिजबिलं तातडीने माफ करण्यासाठी भाग पाडावं व सर्व सामान्य जनतेला दिलासा द्यावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे तहसिलदार दत्तात्रेय शेजुळ यांना निवेदन सादर करण्यात आले.
याउपरांतही शेतकऱ्यांची या अवास्तव विजबिलांच्या विळख्यातून शासनाने सुटका न केल्यास आंदोलनाचा भडका अधिक तीव्र होईल, असा इशारा कृष्णा जाधव यांनी दिला आहे.