मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षकांना त्यांच्या कार्यालयातच जमावाकडून मारहाण होऊनही व घटनेचा विडियो सर्वत्र व्हायरल होऊनही पोलिसांत मात्र कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. मारहाण करणारे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असल्याची माहिती पुढे आली आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल शिवराळ भाषा वापरल्याचा संबंधित निरीक्षकावर आरोप आहे. दरम्यान सदरचे प्रकरण दोन्हीकडच्या लोकांनी आपसात मिटवलंय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वाहन परवान्याच्या अर्ज सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक डोंगरे यांच्याकडे अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. संबंधित अर्जदार व्यक्ति त्यासाठी परिवहन कार्यालयात वारंवार चकरा मारत होती. पण डोंगरे त्यांना दाद देत नव्हते. अर्ज रखडवण्याच्या कार्यपध्दतीवरून डोंगरे यांची स्थानिक पातळीवर चांगली ख्याती नाही. शनिवारी, संबंधित अर्जदार पुन्हा एकदा विचारणा करण्यासाठी परिवहन कार्यालयात डोंगरेंची भेट घेण्याकरता गेला असता, बोलण्याच्या ओघात, तुम्ही राजकीय कार्यकर्त्यांना इतका त्रास देता, तर इतरांना किती सतावत असाल, असं अर्जदारांने विचारल्यावर तुम्ही कोणत्या पक्षाचं काम करता, असं डोंगरेंनी विचारलं. उत्तरादाखल वंचित बहुजन आघाडीचं नाव ऐकल्यावर डोंगरेंची प्रतिक्रिया तुच्छतापूर्ण होती, सोबत अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत आईवरून शिवी हासडत शिवराळ उद्गार काढल्याने वाद वाढला.
ही गोष्ट समजताच वंबआचे कार्यकर्ते परिवहन कार्यालयात जमा झाले व त्यांनी डोंगरेंना जाब विचारला. सुरुवातीला डोंगरेंनी ताठा दाखवण्याचा प्रयत्न केला. पण तणाव वाढतोय हे लक्षात येताच ते सारवासारव करण्याचा प्रयत्न करू लागले. पण बाळासाहेबांना आईवरून शिवी देण्याची तुझी हिंमतच कशी झाली, असं विचारत जमावातून कोणीतरी डोंगरेंवर हात चालवला. मग इतरांनीही मारहाण सुरू केल्यावर जमावातीलच कार्यकर्त्यांनी डोंगरेंना सोडवलं.
सदर प्रकरण दोन्ही बाजूंच्या लोकांनी आपसात मिटवलं असल्याचं एका परिवहन अधिकाऱ्याच्याच हवाल्याने टाईम्स आॅफ इंडियाने म्हटलं आहे.
नांदेडचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी टाईम्सला सांगितलं की निकटच्या पोलिस ठाण्यातील अधिकारी स्वत: परिवहन कार्यालयात जाऊन आला. पोलिसांनी रीतसर परिवहन अधिकाऱ्यांना पत्रही दिलंय, पण तक्रार करायला कोणी पुढे आलेलं नाही.
वंचित बहुजन आघाडीच्या एका पदाधिकाऱ्याने माहिती दिली की कार्यकर्ते मारहाणीच्या उद्देशाने तिथे गेलेले नव्हते. एका सरकारी अधिकाऱ्याने बाळासाहेबांबद्दल इतका आकस का बाळगावा, यांचा जाब विचारायला कार्यकर्ते गेलेले होते. पण चर्चेत डोंगरेंचा सूर अरेरावीचाच होता. त्यामुळे काही कार्यकर्ते चिडले. अर्थात सोडवलंही वंचितच्याच कार्यकर्त्यांनी. दोघांनी एकमेकांची दिलगिरी व्यक्त केल्याने हा विषय मिटलेला आहे.