प्रवाश्यांकडे दुर्लक्ष ; फेरीवाल्यांना झुकतं माप ! आमदार राजू पाटलांचा रेल्वेवर आरोप !!

प्रवाश्यांकडे दुर्लक्ष ; फेरीवाल्यांना झुकतं माप ! आमदार राजू पाटलांचा रेल्वेवर आरोप !!

प्रवाश्यांकडे दुर्लक्ष ; फेरीवाल्यांना झुकतं माप ! आमदार राजू पाटलांचा रेल्वेवर आरोप !!

लोकलमध्ये कोणत्याही परिस्थितीत फेरीवाल्यांना व्यवसायाची परवानगी देऊ नये, यासाठी मनसे आमदार राजू पाटील यांनी जोरदार हरकत घेतली असून मध्य रेल्वेच्या विभागीय महाव्यवस्थापकांना निवेदन देऊन, असा काही विचार असेल तर तो मागे घेण्याची सूचना केली. फेरीवाल्यांसोबत संघर्ष होऊन प्रवाश्यांच्या अडचणीत आणखी वाढ होईल, अशी भीतीही आमदार पाटील यांनी व्यक्त केलीय.

मुंबई शहर आणि उपनगरीय रेल्वेमध्ये रेल्वेकडून फेरीवाल्यांना अधिकृत परवानगी देण्याची कार्यवाही सुरू असल्याची चर्चा कानावर आल्यानंतर खबरदारी म्हणून आमदार राजू पाटील यांनी मध्य रेल्वे विभागीय महाव्यवस्थापकांना निवेदन दिलं आहे.

उपनगरीय रेल्वेमध्ये प्रवाशांना दररोज तारेवरची कसरत करुन प्रवास करावा लागतो. लोकलमध्ये चढायला तर नाहीच, पण पाय ठेवायलाही जागा नसते, अशी सध्याची परिस्थिती आहे. लोकल पकडताना व प्रवास करताना अनेकांनी जीव गमावलेले आहेत. अशा परिस्थितीत फेरीवाल्यांना जर लोकलमध्ये वस्तू विकायला रेल्वे प्रशासन अधिकृतपणे परवाना देणार असेल तर लोकलमध्ये प्रवासी आणि फेरीवाल्यांमध्ये संघर्ष वाढून प्रवाशांच्या अडचणीत वाढ होणार आहे, असं आमदार पाटील यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय.

मध्य रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरे असूनही सद्यस्थितीत मध्ये रेल्वेच्या उपनगरीय रेल्वेमध्ये महिलांच्या डब्यातून रोज हजारोंच्या संख्येने अनधिकृत पुरुष/महिला फेरीवाले सामान विक्री करत आहेत. याबाबत रेल्वेच्या हेल्पलाईन नंबर तसंच आरपीएफ जीआरपीकडे अनेक तक्रारी येत असताना कर्मचारी मनुष्यबळाची कमतरता म्हणून हतबलता व्यक्त करतात.

रेल्वे प्रशासन/आरपीएफ जीआरपी यांच्या सोबत आतापर्यंत या अनधिकृत फेरीवाल्यांवर बंदी आणण्याच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधी/रेल्वे संघटना यांनी अनेकदा बैठक घेऊनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, अशी आमदार राजू पाटील यांची तक्रार आहे.

उपनगरीय रेल्वेमधील वाढत जाणारी प्रवाशांची संख्या पाहता लोकलची संख्या कमी पडत आहे. महिन्याचा किंवा तीन महिन्याचा ॲडव्हान्स पास काढून देखील रोज चेंगराचेंगरीत प्रवास करावा लागत आहे. त्यावर उपाययोजना करण्याऐवजी चुकीचे निर्णय घेऊन प्रवाशांच्या त्रासात वाढ करण्याचे धोरण रेल्वे प्रशासनाने स्विकारलं असल्याची टीका आमदार पाटील यांनी केलीय.

लोकल वाढविण्याची आश्वासने दिली जातात पण अद्यापपर्यंत लोकल वाढलेल्या नाहीत. वेळापत्रक ऑक्टोबरमध्ये बदलणार होते, नोव्हेंबर संपला तरी नवीन वेळापत्रक नाही. यावर उपाययोजना करण्याऐवजी अधिकृत फेरीवाले आणून काय साध्य करायचे आहे. आपल्या या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. याबाबत रेल्वे प्रवासी संघटनांची तत्काळ बैठक आयोजित करावी तसंच प्रवासी आणि फेरीवाल्यांमध्ये भविष्यात होणारा संघर्ष टाळायचा असेल तर रेल्वे प्रशासनाने फेरीवाल्यांना अधिकृतपणे लोकलमध्ये माल विकण्याचा परवाना देण्याचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा, अशी मागणी आमदार राजू पाटील यांनी केलीय.

MediaBharatNews

Related Posts

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!