मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
नाशिक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना पोस्टकार्ड लिहून आपली व्यथा मांडली आहे. केंद्राने शेतकऱ्यांचा कांदा थेट खरेदी करावा , कांद्याची निर्यातीत जास्तीत जास्त वाढ व्हावी व नाफेडने तो २० रुपये प्रति किलो खरेदी करावा अशी शेतकऱ्यांची मागणी असल्याची माहिती प्रहार जिल्हा उपाध्यक्ष व राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे प्रदेश संघटक कृष्णा जाधव यांनी दिली आहे.
आधीच कर्ज व महागाईने पिचलेला शेतकरी. त्यात कोरोनाचा कहर. नाशिकचे नगदी पीक समजले जाणाऱ्या कांद्याने मात्र यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. लाँकडाऊनमध्ये धाबे, रेस्टॉरंट, हॉटेल बंद असल्याने, कांदा केवळ घरगुती वापरात येतोय. कांद्याला गिऱ्हाईक उरलं नाही. शेतकऱ्यांची कांदा विक्री जवळपास ठप्प झालीय..
आता पावसाळा सुरू झालाय. त्यामुळे कांदा सडण्यापेक्षा ५/६ रुपये किलो दराने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. परिणामी शेतकऱ्याला उपासमारीला सामोरं जावं लागत आहे.
नाशिक, लासलगाव बाजारात कांद्याला ५/६ रुपये भाव आहे. शेतकऱ्यांची या संकटातून सुटका होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातून कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा ( कसमादे) तालुक्यांमधील शेकडो गावांच्या हजारो शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना पोस्टकार्ड लिहून आपली व्यथा मांडली आहे.
नारायण सूर्वेंच्या एका कवितेच्या धाटणीवर कांदा पाचाला विकू का नको, काय ते पत्रात लिवा, या भावनेतून आता पंतप्रधान मोदी आता या पोस्टकार्ड आंदोलनाला कसा प्रतिसाद देतात, याकडे शेतकरी डोळे लावून आहे.
लेखक कायद्याने वागा लोकचळवळीचे माध्यम समन्वयक आहेत. पत्रकार, साहित्यिक तसंच सामाजिक कार्यकर्ते आहेत