कोणी लिहितं, दक्षिणेतील ही नदी पितृपक्षातच उगम पावते आणि काही दिवसातच अदृश्य होते. कोणी लिहितं, नवरात्रीपूर्वी ही नदी उगम पावते आणि दीपावलीत गायब होते. घटना धार्मिक चमत्काराशी जोडली जाते आणि लोक नेहमीप्रमाणे कुठलीही खातरजमा न करता, संबंधित विडिओ पुढे पुढे पाठवत राहतात. काही दिवसातच फाॅर्वर्डेड मेनी टाईम्स असा गौरव तो विडिओ मिरवू लागतो. ज्यांनी हा विडिओ पहिल्यांदा पसरवलेला असतो, ते मात्र लोकांच्या अज्ञानावर मनातल्या मनात हसत असतात.

संपूर्ण कोरड्या पात्रात नदीचा प्रवाह समोरून येताना दिसतोय, लोक स्वागताला उभे आहेत, लोटांगण घालून नदीला नमन करताहेत, असं दृश्य विडिओत पाहून कोणालाही तो विडिओ खरा का वाटणार नाही ? विडिओ खराच आहे ; पण विडिओसोबतची माहिती चुकीची, दिशाभूल करणारी व धर्मश्रद्धांचा गैरफायदा घेत लोकांची दिशाभूल करणारी आहे.
तामीळनाडूतील कावेरी नदीची ही घटना मूळात दरवर्षी घडत नाही. ती एकदाच घडली होती सप्टेंबर २०१७ मध्ये. त्या वेळचाच विडिओ दरवर्षी हितसंबंधितांकडून पितृपक्षाशी किंवा नवरात्रीशी बळेच संबंध जोडून पसरवला जातो आणि लोक धर्मश्रद्ध किंवा बुद्धीबधीर आहेत का, याची चाचणी केली जाते.

२०१७ मध्ये १२ ते २४ सप्टेंबर दरम्यान तामीळनाडूतील मईलादुथुराई शहरात कावेरी महापुष्करम उत्सवाचं आयोजन केलं गेलं होतं. उत्तरेत जे गंगानदीचं महत्त्व आहे तशीच दक्षिणेत कावेरीची महती आहे. १४४ वर्षांनंतर हा उत्सव आला होता. पण कावेरीचं पात्र कोरडं होतं. मग जवळच्याच धरणातून नदीत पाणी सोडण्याची विनंती आयोजकांनी केली होती.

थुला कट्टम येथे भाविकांना स्नानासाठी कुंड निर्माण करण्यात आलं होतं. १९ सप्टेंबर २०१७ रोजी जेव्हा मैत्तूर धरणातून पाणी सोडण्यात आले तेव्हाचा तो पाण्याचा प्रवाह कावेरीच्या कोरड्या पात्रात येताना विडिओत दिसतो.
तो नैसर्गिक प्रवाह नाही. नदीचा आकस्मिक उगमही नाही. तो चमत्कार तर नाहीच नाही. पितृपक्ष किंवा नवरात्रीशी संबंध जोडून दिशाभूल करणं हा निव्वळ लोकांच्या धर्मश्रद्धेशी केलेला खेळ आहे.