भाज्यांचं निर्जंतुकीकरण केवळ कोविड भयातून आलेल्या मानसिक आजारामुळे !

भाज्यांचं निर्जंतुकीकरण केवळ कोविड भयातून आलेल्या मानसिक आजारामुळे !

भाज्यांचं निर्जंतुकीकरण केवळ कोविड भयातून आलेल्या मानसिक आजारामुळे !

संसर्गजन्य आजाराची भीती जेव्हा मानसिक आजार होऊन बसतो, तेव्हा तो अधिक पसरतो ; कारण वास्तवात जी आणि जशी काळजी घ्यायला हवी, तशी ती घेतली जात नाही ; त्यामुळे जो जे उपाय सांगेल, ते भीतीपोटी कुठलीही खातरजमा न करता सरसकट अमलात आणण्यावर माणसाचा भर असतो. यातूनच गैरफायदा घेणारी माणसं संधी साधतात आणि मनस्तापासोबत आर्थिक लुबाडणूक आणि फसवणूकही होते. एक टप्पा असा येतो की माणसं कशावरच विश्वास ठेवेनाशी होतात आणि तो टप्पा अधिक घातक ठरू शकतो. त्यातही ज्यांनी जबाबदारीने व्यक्त होण्याची गरज असते, ती माणसंही आपल्या शिक्षणाचा यथायोग्य विवेकी वापर न करता भावनिक गोलगोल बोलू लागतात, तेव्हा तर परिस्थिती अधिक चिंताजनक होते.

अलिकडे सरकारच्या हो ला हो म्हणणं, देशभक्तीच्या, देशप्रेमाच्या नावाखाली तर्क, विवेकाचा वापर न करता कुठल्याही ढोबळ गोष्टींचा पुरस्कार करणं म्हणजेही भारतीय प्रशासनिक सेवा होऊन बसलीय. देशातल्या सद्यस्थितीत तर आपल्याकडे अशी काही भाप्रसेवा अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न पडण्यासारखी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.

सुप्रिया साहू ह्या तामिळनाडूत चहा फेडरेशनमध्ये कार्यरत भाप्रसे अधिकारी आहेत. त्यांनी एक विडिओ शेअर केलाय. एक व्यक्ति कुकरच्या शिटीच्या जागी छोटा पाईप लावून त्यातून निघणारी वाफ भाज्यांवर उडवतोय. कोविड फैलावाच्या पार्श्वभूमीवर असे विडिओ अनेकांचे पाहायला मिळतात. सुप्रिया साहू यांच्या ट्वीटनुसार, अशा उपचारांचा भाज्यांचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी कितपत उपयोग होतो, हे निश्चित नसलं तरी भारतीय काय जुगाड करता येतील, ते सांगता येत नाही !

सुप्रिया साहू विडिओतील प्रयत्नांचं कौतुक करताहेत की टिंगल, नेमकं सांगता येत नाही. पण मेरीलॅन्डचे संसर्गजन्य आजार विभागाचे प्रमुख डॉ. फहीम युनुस या उपायांना मानसिक आजार म्हणतात. अशा प्रकारे भाज्यांचं निर्जंतुकीकरण करण्याचा अट्टाहास अनावश्यक असल्याचं डॉ. युनुस सांगतात.

मूळात अन्नातून कोरोनाविषाणू पसरत नसल्याचं डॉ. युनुस यांचं म्हणणं आहे. भाज्या नुसत्या साध्या पाण्याने धुतल्या तरी पुरेसं असतं, असं त्यांचं मत आहे. उलट अशा प्रकारे वाफारा करण्याच्या प्रकारांनी संबंधित व्यक्तिच श्वसनातून हवेतला संसर्ग खेचण्याची शक्यता आहे, अशी भीती डॉ. युनुस व्यक्त करतात.

हात स्वच्छ ठेवण्यासाठी सॅनिटाईझरचाच वापर केला पाहिजे, हा आग्रहसुद्धा डॉ. युनुस नाकारतात. कोरोनाचा विषाणू हातांच्या कातडीतील पेशीत घुसण्याची शक्यता नसल्याने साबण आणि पाण्याने हात धुतले तरी ते उपयोगी आहे. विशेष म्हणजे हे स्पष्टीकरण डॉ. फहीम युनुस यांनी मार्च महिन्यातच दिलेलं होतं.

Factcheck by MediaBharatNews

MediaBharatNews

Related Posts

leave a comment

Create Account



Log In Your Account



Don`t copy text!