मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम
माजलगाव येथील केसापुरीतील ऊसतोड मुकादम अंकुश राठोड गेल्या महिनाभरापासून बेपत्ता होता. आता थेट त्याचा मृतदेहच गोदावरी पात्रात सापडलाय. शिवाय दूरच्या नात्यातल्या आरोपीने हत्येची कबुलीही दिलीय. पण हत्येचं नेमकं कारण काय ? पोलिसांना हा प्रश्न पडलाय.
ज्या आरोपीने कबुली दिलीय, त्याच्या कुटुंबाशी अंकुश राठोडचे अनेक वर्षांपासूनचे संबंध आहेत. ऊसतोडीच्या कामाच्या निमित्ताने सदर कुटुंब व अन्य लोकांशी जवळपास गेल्या २५ वर्षांचा संपर्क आहे. १ नोव्हेंबरला ऊसतोडीच्या कामानिमित्तानेच अंकुश जालन्यातील वाटुरफाटा जायला निघालेला होता. तो पुन्हा परतला नव्हता. माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत नोंद होती.
घरातून निघताना अंकुशकडे भरघोस रोखरक्कम होती ; शिवाय त्याला सगळ्या बोटांत सोन्याच्या अंगठ्या घालायची हौस होती. त्यामुळे घातपाताचा पहिला संशय होता. पण आष्टी पोलिसांच्या तपासात तपासाचा रोख वाटुरफाट्यातील आरोपी कुटुंबाकडे गेला. पोलिसांचा चौकशीचा फास घट्ट होत गेला, तशी आरोपीला हत्येची कबुली देणं भाग पडलं.
अंकुशची मोटारसायकल सांगवीला गोदावरी पात्राजवळ आढळून आली आणि पाठोपाठ मृतदेह हुडकण्यातही पोलिसांना यश आलंय. ते ठिकाण माजलगावहून जवळ आहे. आरोपींनी हत्येशी आपला संबंध दिसू नये, म्हणून धडपड केली ; पण पोलिस तपास वरचढ निघालाय.
अंकुश यांची पत्नी पारूबाई केसापुरीच्या सरपंच आहेत. अंकुशचे सामाजिक राजकीय संबंध जोरदार आहेत. त्यामुळेच ही हत्या बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय झालीय. परस्त्रीसंबंधांपासून ते पैशाच्या व्यवहारापर्यंतच्या प्रत्येक दृष्टीकोनातून पोलिस सदर प्रकरण तपासत आहेत.
दरम्यान, आरोपी एकनाथ चौहान याने, त्याच्या पत्नीशी असलेल्या संबंधांतून अंकुशची हत्या केल्याची कबुली दिल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष सानप यांनी ‘मिडिया भारत न्यूज’ला दिलीय. एकनाथने अंकुशला यापूर्वी समज दिली होती, पण त्याला फरक न पडल्याने सदर बाबीची परिणती हत्येत झाल्याचं सानप यांनी सांगितलं.